गुवाहाटी – शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा पान टपरीवर नाही बसायला लावले तर नाव बदलून ठेवा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती. आता याच टिकेवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही अनेक लोक आपल्या पाठीशी आहेत. आपल्यावर भरपूर टीका झाली. बाप काढले. आपली प्रेते आणण्याची भाषा झाली. पण आमच्या जीवनाचा संघर्ष या लोकांना माहीत नाही. आमची परिस्थिती काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळाले. शिवसेनेच्या आशिर्वादाने मिळाले. पण त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रे ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत.