वेंगुर्ला – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे.या पार्श्वभूमीवर वायंगणी समुद्रकिनारी आढळून आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या ८७ पिल्लांना वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या उपस्थितीत समुद्रासारख्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
यावर्षी सावंतवाडी वन विभाग मार्फत उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील समुद्र किनारी समुद्री कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करण्याचे काम चालू आहे.तसेच वेंगुर्ले तालुक्यामधील समुद्र किनारी आतापर्यंत ७४ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत.त्यातील वायंगणी साळगावकरवाडी येथील प्रकाश नारायण साळगावकर यांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी ह्या हंगामातील पहिले समुद्री कासव ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांचे घरटे संरक्षित केले होते. त्यातून तब्बल ८७ पिल्ले घरट्यातून बाहेर आली. ही पिल्ले कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे कुडाळ यांच्या उपस्थितीत सुरक्षित समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली. त्यावेळी प्रकाश साळगावकर, वायंगणीचे उपसरपंच हर्षद साळगावकर,उपसरपंच वायंगणी,मठचे वनपाल सुर्यकांत सावंत,वन रक्षक शंकर पाडावे,वनसेवक , अमित रोकडे आणि वेंगुर्लेचे प्रकल्प समन्वयक दिगंबर तोरस्कर आदी जण उपस्थित होते.