अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप आणि बापू अकोलकर या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ उडाली आहे. त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे तलावालगत असलेल्या भागात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते मेंढ्या काही वेळ चारून झाल्यानंतर पाणी पाजण्यासाठी तलावामध्ये डबक्यात असलेल्या पाण्यावर ते गेले.
मेंढ्यांचे पाणी पिऊन झाल्यानंतर संदीप पाण्यात उतरून मेंढ्या धुऊ लागला. मेंढ्या धूत असतानाच संदीपचा पाय खोलात गेला आणि त्याने लहान भाऊ बापूला आवाज दिला. बापूने हात दिला आणि संदीपला वर काढण्याचा प्रयत्न करु लागला. या ओढाताणीत बापूच पाण्यात गेला. दोघेही पाण्यात पडले दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. दोघेही पाण्यात पडल्याचे लांबूनच संदीपच्या पत्नी सोनालीने हे पाहिले आणि तिने आरडाओरड केली. त्यानंतर नामदेव अकोलकर, दादा मुखेकर यांनी या दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. दोघांही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले.