उरण- सध्या उरण शहर आणि परिसराला वेगळ्याच प्रकारच्या समस्येने ग्रासले आहे.तालुक्यातील कोप्रोली- बांधपाडा गावाच्या हद्दीत असलेल्या ग्लोबिकॉन कंपनीने परदेशातून आणलेली तब्बल पाच कंटेनर भरलेली किवी फळे उघड्यावर फेकून दिली आहेत. ही फळे कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याची दुर्गंधी संपूर्ण शहर आणि परिसरात पसरली आहे. त्यामुळे मोठया रोगराईचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.
ग्लोबिकॉन सीएफएसने परदेशातून आणलेली किवी फळे पाच कंटेनरमध्ये भरून ठेवली होती.मात्र सीमाशुल्क विभागाची परवानगी न मिळाल्याने ही फळे अनेक दिवस तशीच गोदामात पडून होती.परवानगी लवकर मिळत नसल्याने गोदामाचे भाडे आणि रिफर कंटेनरचे वाढत चालल्याने निर्यातदाराकडे पाठपुरावा करूनही त्याने हा माल उचलला नाही.त्यामुळे कंपनीने ही सगळी फळे कंपनीच्या कंपाऊंडमध्ये खाडीच्या किनारी फेकून दिली.पण आधीच खराब झालेला हा नाशिवंत माल कुजका बनला आहे. या फळातील पाणी आणि रस नाल्यामधून खाडीत मिसळले आहे. त्यामुळे शहर आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी कंपनीला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आता प्रदूषण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.