गडचिरोली – शेतात गेलेल्या एका शेतकर्याला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील बोरीचक गावाजवळ घडली. सागर आबाजी वाघमारे (45) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने सागर वाघमारे हे आपल्या शेतावर गेले होते. यावेळी झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक सागर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सागर यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्राच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान, गेल्या आठवड्यातील रविवारी सकाळी येथे एका युवकास वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज बोरीचक येथे दुसरी घटना घडली. शेतीचा हंगाम सुरू असताना वन्यजीव-मानव संघर्ष सातत्याने होत असल्याने शेतीची कामे कशी करायची या भीतीने शेतकरी त्रस्त आहेत.