मुंबई – काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका गोवा काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती आज हायकोर्टाने फेटाळली. त्यामुळे गोवा काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. दोन तृतीयांश आमदारांच्या गटाने भाजपत प्रवेश केल्याने त्यांना अपात्र ठरवता येत नाही, असे न्यायालयाने हा निर्णय देताना सांगितले.
काँग्रेसच्या १२ पैकी १० आणि महाराष्ट्रवादी गोमंतकच्या २ अशा एकंदर १२ आमदारांनी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गोव्यात सत्तांतर झाले. ४० सदस्यसंख्या असलेल्या गोवा विधानसभेची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. असे असताना काँग्रेसचे १० आणि महाराष्ट्रवादी गोमंतकचे २ अशा १२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले आणि भाजपची तेथे सत्ता आली. याच्या विरोधात गोवा काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि महाराष्ट्रवादी गोमंतकचे सुदीन धवलीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी या १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. ती उच्च न्यायालयाने फेटाळली.