धाराशिव :- अतिवृष्टीमुळे धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, धाराशिवमध्ये जमावबंदीचे आदेश असूनही आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या ३० कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे २०२२ मध्ये नुकसान झाले. त्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे, हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले होते. मात्र, जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रकार केल्यामुळे अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला होता.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत २२ हजार क्विंटल हरभरा व्यापाऱ्यांना विकलेला आहे. मात्र शासनाने अद्यापपर्यंत हमी भावाने खरेदी करण्यासाठी हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शासनाने ३० हरभरा खरेदी केंद्र त्वरित मंजूर करून चालू करावीत, हरभरा खरेदी करताना शेतकन्यांसाठी हेक्टरी १५ क्विंटल हरभरा उत्पादकता जाहीर करावी, शासनाने कांद्याला १ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान मंजूर करून हमीभाव खरेदी केंद्र त्वरित चालू करावीत आदी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.