नवी दिल्ली – दहावी-बारावीच्या ऑफलाईन परिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टाने अशा याचिका विद्यार्थी व पालकांना फक्त खोटी आशा दाखवतात. अशा याचिकांवर चर्चा करणे म्हणजे यंत्रणेत गोंधळ निर्माण होण्यासारखे आहे. परीक्षांबाबत प्रशासनाला निर्णय घेऊ द्या, असे खडेबोलही याचिकाकर्त्यांना सुनावले. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने आता दहावी, बारावीच्या परिक्षा ऑफलाईनच होणार हे स्पष्ट झाले आहे.
वकील आणि बाल हक्क कार्यकर्ते अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी ऑफलाईन परीक्षेऐवजी पर्यायी मूल्यमापन पद्धतीने निकाल देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. न्यायालयाने दहावी, अकरावी, बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेऐवजी मूल्यमापनाच्या पर्यायी पद्धतींचा अवलंब करण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत श्रीवास्तव यांनी म्हटले होते. तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेतले असताना ऑफलाइन परीक्षा का घेताय? असेही या याचिकेत त्यांनी म्हटले होते. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली होती. त्यानुसार आज दुपारी सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती खानविलकर यांनी याचिकाकर्त्यांना म्हटले की, या याचिकांना कोणताही आधार नाही. अशा याचिका विद्यार्थी-पालकांना फक्त खोटी आशा दाखवतात. याआधी जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. अशा याचिकांवर चर्चा करणे म्हणजे यंत्रणेत गोंधळ निर्माण होईल. परीक्षांबाबतीत प्रशासनाला निर्णय घेऊ द्या. अशा प्रकारच्या याचिकेमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तशा बातम्याही आम्ही पाहत आहोत. या याचिकेला प्रसिद्धी कोणी दिली? हे सर्व थांबायला हवे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक गोंधळ निर्माण होईल. पुन्हा याचिका दाखल करायला येऊ नका. विद्यार्थी आणि प्रशासनाला त्यांचे काम करू द्या. तुम्ही अशा याचिका दाखल करू शकत नाहीत, अशा कडक शब्दांत सुप्रीम कोटार्र्ंने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले व याचिका फेटाळून लावली.