रत्नागिरी- दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांनी पर्यटनाच्या माध्यमातून दापोली तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. एका बाजूला हिरवेगार डोंगर तर दुसर्या बाजूला निळाशार समुद्र याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोलीमध्ये येतात. मुंबई व पुणे येथून येणार्या पर्यटकांमुळे तालुक्यामध्ये आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र दापोलीत येणार्या पर्यटकांची संख्या व त्यांचे मुक्कामाचे दिवस वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन पातळीवर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने विकास व्हायला हवा. यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्ने तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर दापोली कोकण कृषी विद्यापीठात मत्स्यालय उभारणे आवश्यक आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दापोलीत जैवविविधता पार्कची गरज आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारणे, तसेच शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर कायमस्वरूपी होलोग्रफिक अथवा लेझर शो करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.