मुंबई – शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ‘महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमार्फत मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबावर वारंवार होणाऱ्या आक्षेपार्ह विधानांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत’, असा दिपाली यांच्या पत्राचा विषय आहे. त्यांनी मोदींना गेल्या २५ वर्षांच्या युतीचा आणि शिवसैनिकांचा विचार करून आपली भूमिका मन की बातममधून स्पष्ट करावी, असे पत्रातून सांगितले आहे.
दिपाली यांनी पत्रात म्हटलंय, ‘गेल्या दहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर वारंवार होणाऱ्या अपशब्द, खालच्या पातळींवर होणाऱ्या आक्षेपार्ह विधानांबाबत आपणांस माहिती देऊ इच्छिते की, भाजपाचे नेते किरीट सोमय्या, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, आमदार अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील व भाजपा पाठिंबा करत असलेली अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती हे वारंवार जाणूनबुजून मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबावर खालच्या पातळींवर आक्षेपार्ह विधाने करत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना ही आरेला कारे करणारी संघटना आहे. तरी याबाबतीत भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रियेला उलट प्रत्युत्तर देण्याकरीता खुद्द देशाच्या पंतप्रधानांवर आम्हाला जशाच तशी टीका करावी लागत आहे. त्याचे कारण असे की या सर्व भूमिका आपल्या मार्गदर्शनाने घडविल्या जात आहेत असा संदेश महाराष्ट्रातील जनतेकडे किंवा शिवसैनिकांपर्यंत पोहोचत आहे, तरी भारताचे पंतप्रधान आपण असूनसुद्धा आपल्यावर टीका करणे किंवा जशाच तसे उत्तर देण्यासाठी आपले आम्हाला नाव घ्यावे लागते. या सर्व वर्तणुकीमुळे बरेच आंदोलन व पोलीस तक्रार, खटले, जीवे मारण्याच्या धमक्या, इत्यादी गोष्टींना सेना-भाजपा कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागत आहे व या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडत आहे, तरी आपण गेल्या २५ वर्ष युतीचा व शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करून तात्काळ आपली भूमिका सर्व गोष्टींना पाठिंबा देते का हे ‘मन की बात’ याद्वारे व पत्राद्वारे स्पष्ट करावीत. आपली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेला वेगळे वळण देणारी असेल. आपण यावर प्रतिक्रिया न दिल्यास हे असेच चालू राहून कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. यामध्ये महाराष्ट्राचे नुकसान लक्षात घेऊन माझ्या पत्राची काळजीपूर्वक दखल घ्यावी ही नम्र विनंती.’
दरम्यान, ‘भाजप म्हणजे वादग्रस्त विधानांचा कळस म्हणावे लागेल. आदरणीय मोदीजी, नुपूर शर्मा प्रकरणा आगोदर महाराष्ट्रातून तुमच्या दिल्ली पीएमओ कार्यालयात पोहचवलेल्या पत्राचे उत्तर कधी मिळणार? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी न्याय वेगळा करणार का?’, असे म्हणत दिपाली यांनी हे पत्र ट्विट केले आहे.
भाजप म्हणजे वादग्रस्त विधानांचा कळस म्हणावे लागेल ! आदरणीय मोदीजी, नुपूर शर्मा प्रकरणा आगोदर महाराष्ट्रातुन तुमच्या दिल्ली PMO कार्यालयात पोहचवलेल्या पत्राचे उत्तर कधी मिळणार ? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी न्याय वेगळा करणार का?
— Deepali Sayed (@deepalisayed) June 7, 2022
@ShivSena pic.twitter.com/CKwjWgfVVL