मुंबई – नागपूर ते हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकरात सुरू करावी अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे. विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांताना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. तर हैद्राबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद जोडणार्या सध्या २२ रेल्वे गाड्या असल्या तरी ५७५ किमीचे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक असल्याचे मुनगंटीवर यांनी सांगितले. या गाडीमुळे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीसाठी नागपूर हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.