मुंबई – परतीच्या पावसाचा मोठा फटका भाजीपाल्याच्या शेतीला बसला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्याचा थेट फटका मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांमधील सामान्य ग्राहकांना बसत आहे. भेंडी, गवार, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. अनेक भाज्यांनी १०० रुपये किलोचा टप्पा ओलांडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
परतीच्या पावसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. त्याचा फटका भाजीच्या शेतीला बसला. पिके वाया गेल्याने बाजारात भाज्यांची आवक घटली. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यामुळे त्यांचे दर वाढले. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ४०० ते ४५० गाड्या भाज्यांची आवक होते. त्यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे भावातही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गवार १२० रुपये किलो, वाटाणा २५० रुपये किलो, फ्लॉवर १०० रुपये किलो झाला आहे, अशी माहिती वाशीतील व्यापाऱ्यांनी दिली. पावसात भाजी भिजली असल्यामुळे ती साठवून ठेवता येत नाही. सर्वसाधारणपणे पुणे आणि नाशिकमधून फळभाज्यांची आवक होते. परंतु पावसामुळे त्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे त्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. आणखी १०-१२ दिवस भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे अजूनही सिन्नर, येवला आणि नाशिकमध्ये अनेक शेतांत चिखल आहे. त्यामुळे भाजीपाला काढण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.