मुंबई – कोरोनापूर्वी पश्चिम रेल्वेची दररोजची प्रवासी संख्या ३५ लाख होती.मात्र, कोरोनानंतर आता दररोजची प्रवासी संख्या २५ लाखाचा घरात आली आहे.या मार्गावरील जवळपास १० लाख प्रवासी कमी झाले आहेत.याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या महसुलावर पडत आहे.त्यामुळे प्रवासी संख्या का कमी झाली यासाठी पश्चिम रेल्वे अभ्यास गट नेमणार असल्याची माहिती शुक्रवारी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.हा अभ्यासगट नेमक्या कारणांची चौकशी करणार आहे.
काल शुक्रवारी पश्चिम रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी पश्चिम रेल्वेवर सुरु असलेल्या विविध योजना संदर्भात माहिती दिली.त्यावेळी पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या घटल्याची माहिती महाव्यवस्थापक अशोककुमार मिश्रा यांनी दिली.यावेळी अशोक कुमार मिश्र यांनी सांगितले की, सध्या बांद्रा-कुर्ला संकुलात अनेक सरकारी-खासगी कार्यालये सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवासी आता चर्चगेटला येत नाही. त्यातच कोरोनापासून अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्कफोर्म होम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. परंतु, बांद्रा-कुर्ला संकुलात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने बांद्रा ते विरार दरम्यानच्या लोकल फेऱ्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.खार ते गोरेगाव सहावी मार्गिका मार्च २०२३ -पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सहाव्या रेल्वे मार्गाचे काम दोन टप्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात खार ते गोरेगाव दरम्यानचा मार्ग मार्च २०२३ पर्यत तर दुसऱ्या टप्यात गोरेगाव ते बोरीवली मार्ग मार्च २०२४ पर्यत पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे.