नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) आणि जम्मू काश्मीर गझनवी फोर्स (जेकेजीएफ) यांना दहशदवादी संघटना म्हणून घोषित केले. याशिवाय बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या हरविंदरसिंह संधू ऊर्फ रिंदा याला दहशतवादी घोषित केले. केंद्र सरकारने बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (युएपीए) अंतर्गत आतापर्यंत ४४ संघटना आणि ५३ व्यक्तींना दहशवादी असे घोषित केले आहे.
रिंदा हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून सध्या तो पाकिस्तानातील लाहोर ते पंजाबपर्यंत अनेक दहशदवादी कारवाया करत आहे. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारी ‘बब्बर खालसा’ ही दहशतवादी संघटना आहे. कॅनडा, जर्मनी आणि युकेमधून याचे काम सुरु आहे. या संघटनेशी संबंधीत रिंदा हा भारतासाठी वॉन्टेड असला तरीही सध्या त्याचे वास्तव्य पाकिस्तानात आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने त्याला आश्रय दिला असल्याचे सांगण्यात येते.