मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती सन २०२० च्या पुरस्कारामध्ये सुप्रसिद्ध बालसाहित्यकार , मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील शिक्षक आणि जे के मीडियाचे लेखक एकनाथ आव्हाड यांच्या शब्दांची नवलाई या दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या बालकवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे. रूपये ५००००/- (पन्नास हजार), सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
म्हणी , वाकप्रचार , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, जोडशब्द, अलंकार, व्याकरण… हे सारेच शब्दांची नवलाईमधील कवितांमधून सहजगत्या उलगडले आहे. एकंदरीतच मराठी भाषेची गोडी वाढवणा-या बालकविता या पुस्तकात आहेत.
आजपर्यंत या पुस्तकास आखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, ए.पी.रेंदाळकर वाचनालय, कोल्हापूरचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्य विहार संस्था, नागपूरचा उत्कृष्ट कुमार साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर या संस्थेचा विमलबाई देशमुख स्मृती सूर्यांश राज्यस्तरीय पुरस्कार आणि साहित्यकणा फाउंडेशन नाशिक चा डॉ. राहुल पाटील स्मृती उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत.