नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरचे 97 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकच्या ब्रम्हगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळाले असून त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवण चा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यात त्र्यंबकेश्वरच्या मागील बाजूस ब्रम्हगिरीला सुरुंग फोडण्याचे काम सुरु होते. त्याला आता आळा बसणार आहे.
नुकतेच महाराष्ट्र सरकारने वनक्षेत्रांना नुकताच संवर्धन राखीव हा दर्जा बहाल केला असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह कळवण आणि इगतपुरी तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह 97 किलोमीटर, यामध्ये वाघेरा, वरसविहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचूर्ली, कळमुस्ते, उभाडे, आळवंड, मेटघर किल्ला, चंद्रयाची मेट, अस्वली हर्ष, हर्षवाडी, आव्हाटे, वाढोली, कोजुली, पाहीन, भिलमाळ, त्र्यंबकेश्वर आदी परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भूमाफियांच्या चोरीला चाप बसणार आहे. प्रतिबंधक क्षेत्रामध्ये आता कोणतेही उत्खनन करता येणार नाही.