मुंबई – भरधाव टँकरने तिघांना धडक दिल्याने दोन वर्षाच्या आणि तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चेंबूर पोलीस ठाण्याजवळ घडली. या अपघात मुलीची आई गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रुती गुप्ता (२) आणि ऋषी (३) अशी दोन मृत चिमुरड्या मुलांची नावे आहेत. श्रुती गुप्ता ही कल्याण येथे राहणारी असून आई रंजना गुप्ता (२८) हिच्यासोबत ती मामांच्या घरी आली होती. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास चेंबूर नाका परिसरात असलेल्या एका रुग्णालयात आईसह ही चिमुरडी गेली होती. रुग्णालयातून हे तिघेही घरी परतत असताना चेंबूरच्या चरई तलावाजवळ रस्ता पार करत असताना चेंबूर कॉलनीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वेगात आलेल्या या टँकरने रस्ता पार करणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली.यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले होते.तत्काळ तिघांना सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच श्रुती आणि ऋषीचा मृत्यू झाला. तर यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी टँकर चालक राजेंद्र गोहिल (४६) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
