कोलकाता – भाजपला पराभूत करणं सोपं असल्याचा दावा करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा स्थानिक पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. येत्या लोकसभेमध्ये म्हणजे २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असेल तर देशातील सर्व स्थानिक पक्षांनी एकत्र यावे असे ट्विट करत म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आपला पक्ष यूपीमध्ये निवडणूक लढवत नाही. पण येत्या ८ फेब्रुवारी रोजी अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी प्रचाराला जाणार आहे. आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याची तयारी केली असून त्याची सुरुवात गोव्यापासून होत आहे. आमच्याकडे आता दोन वर्षे आहेत. या काळात आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार आहे. २०२४ सालच्या निवडणुकीत ४२ पैकी ४२ जागा या तृणमूलच्या पारड्यात पडतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.”
ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यात आली. तृणमूलच्या अध्यक्षपदाची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते. ममता बॅनर्जी यांनी १९९८ साली काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांनी तृणमूलची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत त्याच पक्षाच्या अध्यक्षा आहेत. २०११ साली डाव्या पक्षांना मात देऊन त्यांनी पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत केली. गेल्या वर्षी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने २९४ पैकी २१४ जागा जिंकल्या आहेत.