पंढरपूर:माउली कॉरिडॉर वाद चिघळत असतानाच प्रशासनाने शीघ्र कृती दलाचे मंदिर परिसरात संचलन केल्याने व्यापारी आणि नागरिकाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे दबाव तंत्र असल्याचे म्हणत आम्ही या दबावाला घाबरणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, माऊली कॉरिडॉरचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यात आज सकाळी अचानक मंदिर परिसर, शिवाजी चौक, महाद्वार घाट अशा महत्वाच्या ठिकाणी सशस्त्र शीघ्र कृती दलाच्या बटालियनने संचलन केल्याने व्यापारी आणि बाधित नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे. नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हे दबाव तंत्र आणि दहशतीचा भाग असून याला आम्ही घाबरत नाही अशी भूमिका आता आंदोलकांनी घेतली आहे. आम्ही अतिरेकी असल्यासारखे आम्हाला घाबरावयाला रॅपिड एक्शन फोर्स आणण्यात आले, मात्र आमची घरे-दारे जाणार असतील तर आम्ही गोळ्याही खाऊ मात्र कॉरिडॉर रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.असे कमांडो फिरवून आम्ही घाबरणार नसल्याच्या प्रतिक्रिया येथील काही महिला आंदोलकांनी दिल्या आहेत.
एकूणच पंढरपूर विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉर राबविण्याच्या तयारीत सध्या शासन आहे. मात्र या प्रकरणी बाधित व्यापारी आणि नागरिकांचा मात्र कोणत्याच बाजूने विचार केला जात नाही. त्यांना केवळ झुलवत ठेवले जात असल्याचा आरोप व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले असतानां आज अचानक मंदिर परिसरात ६३ सशस्त्र कमांडो असलेल्या बटालियनने संचलन केल्याने वातावरण अधिकच चिघळत असल्याचेच दिसत आहे.
दरम्यान, आज झालेले संचलन हे नियमित कामकाजाचा भाग असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.