सोलापूर- आपण कायमच एखाद्या विवाहाच्या चर्चा करत असतो किंवा त्या ऐकत असतो. त्याचं कारण असतं फोटो, जेवण, नवरी, नवरा आणि इतर गोष्टी परंतु सोलापूर जिल्ह्यातील अकलूज याठिकाणी एक वेगळाच विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.मुंबईतील दोन उच्चशिक्षित जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत स्वेच्छेने लग्न केले आहे. हा अनोखा विवाह सोहळा अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे पार पडला आहे.
अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.तर मुंबईतील कांदिवलीमधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती.यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. इंजिनीअर पदावर कार्यरत असणाऱ्या रिंकी आणि पिंकी जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचे शिक्षण एकत्रित झाले. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघी एकमेकींसोबत वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत सप्तपदी घेतली.
एकीचे प्रेम आणि दोघींनी लग्नाचा केला निर्धार
काही वर्षांपूर्वी रिंकी आणि पिंकी यांच्या वडिलांचे निधन झाले.त्यानंतर दोघीही बहीणी आईसोबत राहत होत्या.गेल्या काही दिवसांपूर्वी रिंकी,पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या.यावेळी अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तिघींनाही रुग्णालयात दाखल केले. यावेळी अतुल याने त्या तिघींचीही सेवा केली. त्यामुळे तिघींनाही अतुल विषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहीणीमधील एकीचे अतुलवर प्रेम जडले. परंतु, त्या दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या वेगळं होऊन राहू शकत नव्हत्या.त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.
या अनोख्या विवाहाला दोन्ही कुटुंबातील जवळपास ३०० पाहुणे मंडळी गलांडे हॉटेलमध्ये उपस्थित होते. अतिशय थाटात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची सर्वत्र चर्चा सुरु झाली.