मुंबई – मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात विविध विकास कामे केली जातात.मात्र अशी कामे करताना संबधित काही कंत्राटदार हलगर्जीपणा,निकृष्ट दर्जाची कामे करतात.अशा कंत्राटदारांवर पालिकेच्या दक्षता विभागाकडून कारवाई केली जाते. त्यांच्याकडून १ एप्रिल २०२२ पासून ते आतापर्यंत म्हणजे गेल्या ८ महिन्यांत सुमारे ८ कोटीचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी रस्ते,पुल, इमारती बांधकाम,दुरुस्ती आदी विविध प्रकल्प राबवले जातात.या कामांवर पालिकेच्या दक्षता विभागाची नजर असते. दक्षता विभाग झालेल्या कामांचा ऑनलाईन आढावा घेते जातो.त्यामध्ये जर खर्चात अनियमितपणा, हलगर्जीपणा,नियमबाह्य कामे आदीं कामांमध्ये चुका निघाल्या तर दक्षता विभाग त्यावर प्रकाशझोत टाकून असे घोटाळे उघडकीस आणतो.दक्षता विभागाकडून विभागवार कामाची ऑनलाईन तपासणी केली जाते.यावर्षी १ एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास वर्षभरात विविध कामांतील त्रूटी दक्षता विभागाला आढळल्या.त्यानुसार दक्षता विभागाने संबंधित कंत्राटदारांवर सुमारे ८ कोटीचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, काही निकृष्ट दर्जाच्या व वेळकाढूपणा केलेल्या कामांसाठी संबंधित कंत्राटदारांना सुधारणा करण्यासाठी मुदत दिली जाते.या मुदतीत सुधारणा करण्यात आली आहे का याची खातरजमा करण्यासाठी दक्षता विभागाची टीम कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करते. मुदत देऊनही सुधारणा न झाल्याचे आढळल्यास दक्षता विभागाकडून नियमानुसार कारवाई केली जाते.अनेक मोठ्या घोटाळ्यांच्या प्रकरणात पोलिस आणि न्यायालयीन कारवाई, काळ्या यादीत टाकणे अशी कारवाईही केली जाते.रस्ते बांधणी,डांबरीकरण, पूल बांधणी, दुरुस्ती, विविध खरेदी, इमारत बांधकाम, कामांतील अनियमितपणा, हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जाचे काम आदींवर पालिकेचा दक्षता विभाग लक्ष ठेवून असतो,अशी माहितीही वरीष्ठ अधिकार्यांनी दिली.