मुंबई- राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठले होते. पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून होते मात्र संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे साचलेले पाणी ओसरले.मुंबईला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, वसईच्या मिठागरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने तब्बल ३०० ते ४०० रहिवासी घरामध्ये अडकून पडले आहेत.
वसईच्या मिठागर परिसरात कमरेहून अधिक पाणी साचले असून या नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. वसई विरार महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.मिठागरात ३०० ते ४०० नागरिक राहत असून दरवर्षी याठिकाणी पाणी साचते. मिठागराला पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. महानगरपालिकेच्या प्रशानाकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र नागरिकांनी प्रशानाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. मिठागरात ३ ते ४ फूट पाणी साचले असल्याने रहिवाश्यांची गैरसोय होत आहे.पण आता या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरु आहेत.वसईत पावसाची संततधार सुरु असल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.