लातूर – अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांची मालकी असलेल्या मे.देश अँग्रो कंपनीचे राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अतुल सावेंनी चौकशीचे आदेश दिल्याचे पत्र लातूर भाजपकडून जारी करण्यात आले आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या मे.देश अँग्रो या कंपनीला एमआयडीसीने नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप केला आणि तसेच त्यांच्या कंपनीला जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे 120 कोटींचे कर्ज वाटप केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपकडून करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे पदाधिकारी प्रदीप मोरे यांनी निवेदनाद्वारे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. मे. देश अँग्रो प्रा. लि. ही कंपनी 23 मार्च 2021 रोजी स्थापन झाली होती. त्यानंतर कंपनीने लगेच 5 एप्रिल 2021 रोजी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये सॉलव्हट प्लॉटसाठी जागा मागणीचा अर्ज केला होता. त्यानंतर लगेच 9 एप्रिल 2021 ला मुंबईत संबंधित अर्जाविषयी बैठक होऊन कंपनीसल तब्बल 2,52,726 चौ. मि. म्हणजेच 62 एकर 17 गुंठे जागा देण्यात आली. संबंधित कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 5 सप्टेंबर 2021 रोजी 61 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. तसेच पंढरपूर अर्बन बँकेने 4 ऑक्टोबर 2021 रोजी 4 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. या एकूण 65 कोटींच्या कर्जासाठी कंपनीने केवळ एमआयडीसीकडून मिळवलेला भुखंड गहाण ठेवला. त्यानंतर पुन्हा या कंपनीस लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 55 कोटी रुपये कर्ज मंजूर दिले आणि यासाठी कंपनीने त्यांना मिळालेला एमआयडीसीचा तोच भूखंड गहाण ठेवला. अशाप्रकारे एकूण 120 कोटींचे कर्ज कंपनीने मिळवले आहे. बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून भुखंड आणि कर्जवाटप झालेले आहे,असे निवेदनात म्हटले होते. संबंधित आरोपांची दखल घेत सावे यांनी चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.