उमरखेड – लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी नववधुचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ येथील सोमठाणा शिवारात येथे ही घटना घडली. या अपघातात नववधुसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
पूजा पामलवाड हिचा विवाह 19 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील नागेश कन्हेवाड याच्याशी झाला. लग्नानंतर नवरा नवरी आपल्या गावाकडे परत आले. प्रथेप्रमाणे नववधुला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरची मंडळी आली होती. माहेरच्या मंडळीसह नववधू आणि वर साखरा गावकाडे जात होते. मात्र, सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या ढाब्यासमोर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. हिमायतनगरकडून नांदेडकडे विटा घेऊन निघालेल्या वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात पूजा ज्ञानेश्वर पामलवाड ही नववधू, दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड हा तिचा सख्खा भाऊ, तसेच संतोष परमेश्वर पामलवाड हा चुलत भाऊ हे जागीच ठार झाले. तसेच गाडी चालक सुनील दिगांबर धोटे रा. चालगणी याचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात नवरदेव नागेश साहेबराव कन्हेवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.