मुंबई- मुंबई आणि उपनगरातल्या लोकल वाहतुकीला मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमुळे येणारा अडथळा दूर करण्यासाठी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे फलाटांवर होणारी गर्दी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत फारसा वापर होत नसलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मेल आणि एक्स्प्रेसच्या २८ गाड्या वळवण्यात येणार आहेत.
ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील अप आणि डाऊन मार्गावरील १८ मेल-एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म ७ आणि ८ वर थांबत आहेत. त्यात आणखी दहा मेल-एक्स्प्रेसची भर पडेल. त्यामुळे गर्दी विभागली जाईल.जलद लोकलचा खोळंबाही टळेल. कल्याण आणि दादर रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनिश गोयल यांनी दिली.
गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रचंड गर्दीचा अनुभव घेतला. गोयल म्हणाले की, ठाण्यातून प्लॅटफॉर्म ५ ते ६ वरून दररोज अप- डाऊन दिशेने ३१० मेल-एक्स्प्रेस जातात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची आणि उपनगरी प्रवाशांची गर्दी होते. ती विभागण्यासाठी १८ रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म सात – आठवर थांबविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी दहा मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्यात येणार आहेत. परिणामी, प्लॅटफॉर्म पाच ते आठवरची गर्दी कमी होण्यास मदत होईल.