मुंबई – कोरोना महामारीनंतर मणक्याचे विकार हा विषय ऐरणीवर आला असून आजमितीला भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि मणक्यांच्या विकारांनी त्रस्त आहे. सर्व साधारण: दर दहा व्यक्तींमध्ये आठ व्यक्तींमध्ये दैनंदिन जीवनातील चुकीच्या जीवनशैलीमुळे हाताळलेल्या शारीरिक हालचाली ही प्रामुख्याने मणके विकाराच्या व्याधींच्या प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत आहे. मात्र सांधेरोपणाप्रमाणे मणक्यांचे रोपण होऊ शकत नाही. म्हणूनच मणक्यांच्या आजारावर दुर्लक्ष करून चालणार नाही याच उद्देशाने दरवर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक मणके विकार दिन साजरा होतो.
याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे अस्थीव्यंगतज्ञ व शल्यविशारद डॉ. धनंजय परब म्हणाले ,” संपूर्ण जगामध्ये ५४ करोड नागरिक हे मणक्याच्या विकारांनी त्रस्त असून यातील ३० टक्के नागरिकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे भारतामध्येसुद्धा मणक्याचे विकार वाढीस लागलेले आहेत. मानवी पाठीचा कणा हा मणके व दोन मणक्यांमधील गादी अशा पध्दतीने ही एक मालिका असते. एकूण ३३ मणक्यांनी ही मालिका बनलेली असते. त्यात ७ मानेचे मणके (सर्व्हायकल), १२ मणके पाठीचे (थोरॅसिक), ५ कंबरेचे (लंबार), ५ जोडलेले सेक्रम आणि ४ जोडलेले मणके (कॉसीक्स) असे असतात. जीवघेण्या स्पर्धेमुळे आपण आपल्या शरीरातील या महत्वाच्या अवयवांकडे दुर्लक्ष करतो.
ब्रिटनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मणक्यांच्या आजारांमुळे वर्षाचे ७ कोटी तास वाया जात असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे आपल्याकडे असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत ब्रिटनची लोकसंख्या खूपच कमी असून भारतामध्ये सर्वात जास्त कष्टाची कामे केली जातात यामध्ये शेती, अवजड उद्योग, दळणवळण याचा समावेश आहे. कोरोना महामारीनंतर वर्क फ्रॉम होम पद्धती खूपच प्रसिद्ध झाली व ती अजून दोन वर्षे तरी कायम राहील अशी अपेक्षा आहे. घरून काम करीत असताना आपल्या मणक्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. एकाच पोजिशनमध्ये एक तासाहून अधिक वेळ घालवू नये, दार दोन तासांनी शारीरिक हालचाल करावी, नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण तसेच धूम्रपान न करणे तसेच चुकिच्या पद्धतीत बसणे टाळावे. घरून काम करणारे अनेकजण आपल्या झोपण्याच्या बेडवरूनच काम करतात व हि बसण्याची पद्धत पूर्णपणे चुकीचे आहे कारण यामुळे मानदुखी सुरु होते, अनेकजण जमीनीवर बसून तासनतास काम करतात त्यामुळे त्यांच्या पायावर जोर येऊन कंबरदुखी सुरु होते.”
चुकीची जीवनपद्धती व मणक्याचे आजार याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ म्हणाले, “कोरोनाचे निर्बंध लागल्यापासून शरीराची हालचाल मंदावली आहे. आजच्या जीवनशैलीत ‘एग्झरसाईज’ जीवनातून हद्दपार झाला आणि केवळ ‘एग्झरशन’ उरले! अमेरिकन लोकांच्या जीवनशैलीबरोबरच त्यांचे आजारही आपण उचलले आहेत. आठ तास सलग एका जागी बसणारी तरुण पिढीकडे पाहिल्यावर मणक्यांची स्थिती काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा ! सध्या पाठदुखी व मानदुखी रस्त्यातील खड्डे सुद्धा कारणीभूत ठरत आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने अनेक नागरिकाना पाठदुखी व मानदुखी च्या विकारात वाढ झालेली दिसत आहे, अनेकवेळा आपण रिक्षा व टॅक्सीमध्ये बिनधास्त बसलेले असतो व अचानक रस्त्यात आलेल्या खड्ड्यांमुळे मणक्याला इजा होते. खड्ड्यांच्या दणक्यामुळे मणक्यांमधील स्नायूंच्या पडद्याला इजा होऊन वा लिगामेंट फाटून पाठ दुखू शकते. लिगामेंट फाटल्यामुळे होणारी पाठदुखी मात्र खूप काळ टिकू शकते.वेदना दोन दिवसांपेक्षा अधिक काळ मणक्याच्या वेदना असतील तर तज्ज्ञांचे त्वरीत योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.”