पालघर महावितरणचा भोंगळ कारभार
पालघर : वार्षिक उत्पन्न वीस हजार असणाऱ्या डहाणूतील गावकऱ्यांना लाखोंची बिले आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालघरमधील वीज महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. म्हणजे घरात फॅन, टीव्ही, फ्रिज नाही आणि त्यात महिन्याला हजार रुपये पण पदरी पडत नाही. आणि बिल मात्र हजारो, लाखोंचे. त्यात बिल भारावीच लागतील असा दमच महावितरणाकडून देण्यात येत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या गावकऱ्यांसाठी ही बिल कशी भरायची हा मोठा प्रश्न पडला आहे.
सविस्तर वृत्त असे की, डहाणूतील धानीवरी कोठबीपाडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना वीज महावितरण विभागाने एका महिन्यात एक लाख २९ हजार रुपयाचे बिल दिल्याचे समोर आले आहे. वार्षिक उत्पन्न २० हजार असलेल्या गायकर कुटुंबाला अचानक लाखोंचे बिल आल्याने त्यांना धक्काच बसला आहे. अजीत गायकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून शासनाने घरकुल योजनेचा लाभ दिला. त्यामुळे घरात अवघे तीन बल्ब आणि एक फॅन इतकाच विजेचा वापर. गायकर यांना मागील अनेक महिन्यांपासून ३०० ते ६०० च्या घरात विज बिल येत होते. या बिलाचा नियमित भरणा करत असतानाही सप्टेंबर महिन्याचे वीज बिल या कुटुंबाला तब्बल १ लाख २९ हजार रुपयांचे आले आहे. त्यामुळे बिलाचा भरणा कसा करायचा असा गंभीर प्रश्न गायकर यांच्यासमोर उभा आहे. यावर वीज महावितरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवाउडवी ची उत्तर देऊन हे बिल तुम्हाला भरावेच लागेल असा दमच दिला जात असल्याचा आरोप गायकर कुटुंबाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या पाड्यातील २० पेक्षा अधिक घरांमध्ये विजेचा वापर कमी असतानाही त्यांना २६ हजार, ६१हजार,७५हजार तर काहीना थेट दीड लाखापर्यंत बिल देण्यात आली आहेत. ही बिल न भरल्यास महावितरण विभागाचे मीटर काढून नेण्यात येईल असा इशाराही ग्राहकांना महावितरणकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.