पेट्रोल डिझेलच्या सातत्याने किंमती वाढत असल्याने वाहनधारक आधीच मेटाकुटीला आले असताना आता विमा सुद्धा वाढणार आहेत. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे.
कोरोनामुळे विमा कंपन्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स १५ ते २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे केली होती. त्यामुळे कंपन्यांनी केलेली मागणी मान्य झाल्यास त्याचा परिणाम देशातील कोट्यवधी वाहनधारकांवर होणार आहे.
भारतात जवळपास २५ सामान्य विमा कंपन्या आहेत. या कंपन्यांनी केलेल्या मागणीला IRDA हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की, त्यांना कोरोनामुळे खूप त्रास होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांची सॉल्व्हेंसी त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.
काय आहे नियम?
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियम IRDAI द्वारे निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.