परभणी:- शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी परभणी तालुक्यातील इरळद येथील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत दूधना नदीपात्रात अर्धजलसमाधी आंदोलन केले. जो पर्यंत बदल्या जोपर्यंत रद्द केल्या जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याने शिक्षण विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
इरळद गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तालुक्यातील इरळद येथील जिल्ह्य परिषद शाळेत पहिली ते दहावी वर्गात 525 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षात या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आल्याने मुलांमध्ये महत्वपूर्ण बदल घडले आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावल्याने शाळा नावारुपाला आली आहे. सहा शिक्षक येथून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी गावातील लोकांना भीती वाटते. यामुळे सर्व शिक्षकांची बदली रद्द करावी , अशी मागणी करत ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.
दरम्यान गटविकास अधिकारी स्वप्नील पवार, गटशिक्षणाधिकारी डी आर रनमाळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बदलीचा निर्णय रद्द झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा पवित्रा घेतल्याने गटविकास अधिकाऱ्याना आल्या पावली परत जावे लागले.