नाशिक- वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या विठूरायाच्या भेटीसाठी उद्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या पालखीचे पावित्र्य लक्षात घेता पालखी मार्गावरील उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने प्रशासानने बंद ठेवावी अशी मागणी निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे पुजारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशी करता राज्याच्या विविध भागांतून संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. या सर्व पालख्यांची शासन दरबारी नोंद करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवारी निघणार आहे. वारीचा 27 दिवसांचा पायी प्रवास असून पंढरपूर येथे पोहचल्यानंतर 5 दिवस पालखी वारीचा पंढरपूरलाच मुक्काम असतो. तेथून पौर्णिमेला परत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रवास सुरु होतो. 18 दिवसांनी पालखी त्र्यंबकेश्वरला पोहचते.