मुंबई- एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. शेखर चन्ने म्हणाले की,एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरू असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन आहे, असे वृत्त सोशल मीडियावर फिरवले जात होते. वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचाराधीन नाही. तसेच अशा तथ्यहिन वृत्तांवर कर्मचार्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.