मुंबई – राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये आता मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील खातेवाटप कधी होणार, कोणते खाते कुणाला मिळेल, याचे आडाखे बांधले जात होते. अखेर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे.
18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणुक होणार असून त्याच्या दुसर्या दिवशी 19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते आहे. या साठीची तयारीही भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात सुरु असल्याचे समजते आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या तगड्या आमदार आणि मंत्र्यांसोबत मिळून भाजपने राज्यात सरकार स्थापन केले आहे. आता भाजपमधील काही प्रभावी आमदार आणि शिंदे गटातील आमदार या दोन्हींतून निवडक आमदारांची राज्याच्या मंत्रिमंडळपदी वर्णी लागणार आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते आहे.