अकोला – राज्यात कोळशाचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात विजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. गरज पडल्यास भारनियमनचा निर्णय घेण्याची गरज पडू शकते,’ असे संकेत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. तसेच वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही पूर्वमुदत दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.
महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले, कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले, याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावे लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे, आवाहन त्यांनी केले.
राज्यभरात शेतकऱ्यांचे वीज बिल खंडित करण्यावरून तीव्र आंदोलने सुरू असताना ऊर्जामंत्री यांचे वक्तव्य हे आंदोलन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आंदोलक व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे.