नवी दिल्ली – ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर अजमेरची कहाणी मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘अजमेर ९२’ असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘२५० तरुणी जाळ्यात अडकल्या’ असा खळबळजनक उल्लेख करण्यात आल्याने प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट १४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
१९९२ मध्ये अजमेरमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘अजमेर ९२’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली असून त्याचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह करत आहेत. २०२२ मध्ये रिलीज झालेला विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला सुदिप्तो सेनचा ‘द केरला स्टोरी’ यापूर्वी दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या पलायनाची कहाणी दाखवण्यात आली होती. तर, ‘द केरला स्टोरी’ मध्ये केरळमधील ३२ हजार हून अधिक मुलींचे ब्रेनवॉश करुन धर्मांतर केल्याचा दावा करण्यात आला आहे.