मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 2 महिन्यात निर्णय घ्यावा, असा अल्टीमेटमच राहुल नार्वेकर यांना दिला आहे. घटनात्मक बाबी तपासून याविषयी निर्णय घ्यायला किती काळ लागेल, हे मी सांगू शकत नाही, असे नार्वेकर यांनी आज स्पष्ट केले. विधिमंडळातील अधिकार्यांबरोबर आयोजित बैठक संपल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 2022 जून-जुलैमध्ये राजकीय पक्षाचा कोणता गट प्रतिनिधित्व करत होता. यासंदर्भात सर्वात आधी निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नार्वेकर म्हणाले, ‘न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवले आहेत, यासाठी
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मी राजकीय दबावाखाली येऊन निर्णय घेईन, असा वारंवार आरोप केला जात आहे. मला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत; तरीही त्यांना हवा तसा निर्णय देणार नाही. लवकरात लवकर निर्णय घेऊ, पण यामध्ये कोणतीही घाई केली
जाणार नाही.’
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू झाला त्यावेळी राजकीय गट कोणता आहे हे निश्चित केल्यानंतर त्या राजकीय पक्षाची भूमिका काय होती, प्रतोद कोणी व्हावे, गटनेता कोणी व्हावे, यावर विचार केला जाईल. हे झाल्यावर प्रत्येक याचिकेवर निर्णय दिला जाईल, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली. ठाकरे गटाकडून कोणतेही निवेदन माझ्याकडे आलेले नाही. मात्र आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा घटनेला अनुसरून आणि नियमानुसारच घेतला जाईल, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका आहेत. याबाबत लवकर निर्यण घेणार आहोत, असेदेखील
नार्वेकर यावेळी म्हणाले.
आमदार अपात्रतेवर निर्णय घ्यायला किती काळ लागेल सांगू शकत नाही
