सोलापूर –
इयत्ता तिसरी, पाचवी व आठवी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आता शाळेत एकही दिवस न जाता परीक्षा देता येणार आहे. काही अडचणींमुळे शाळेत जाता न येणाऱ्या मुलांना मुक्त व दूरस्थ शिक्षणाद्वारे ही संधी मिळणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हा मुद्दा प्राधान्याने समाविष्ट करण्यात आला असून आता त्याची अंमलबजावणी होणार आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवीनंतर विद्यार्थी शाळा सोडत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ‘एनएसएसओ’ने २०१७-१८ मध्ये केलेल्या घरगुती सर्वेक्षणानुसार ६ ते १७ वयोगटातील शाळाबाह्य मुलांची संख्या ३ कोटी २२ लाखांपर्यंत होती. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आणि २०३० पर्यंत शालापूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत १०० टक्के शाळा नोंदणी गुणोत्तराचे उद्दिष्ट ठेवून या मुलांचे प्रमाण घटवण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. देशातील सर्व मुलांना शालापूर्व ते इयत्ता बारावीपर्यंतच्या व्यावसायिक शिक्षणासह गुणवत्तापूर्ण सर्वांगिण शिक्षणाची सार्वत्रिक उपलब्धता निश्चित करण्यासाठी व तशी संधी देण्यासाठी सर्वसमावेशक देशव्यापी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी प्राधान्याने दोन उपक्रम राबवले जाणार आहेत.