एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेषांतर करून दिल्लीला जायचे! गौप्यस्फोटानंतर गंभीर आरोप

नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात तर उपमुख्यमंत्री अजित पवार दरवेळी वेष बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटायचे. अजित पवार यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आणि आज सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी सुरक्षेबाबत सवाल करून जोरदार
टीका केली.
ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत. मग वेषांतर करून हे दोघे विमानाने प्रवास कसे करीत होते? त्यांना अशा तर्‍हेने सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन विमानतळावर जाता येत होते तर दहशतवाद्यांनाही जमेल. याचा अर्थ विमानतळावर सुरक्षेत त्रुटी राहिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दहशतवाद्यांना प्रेरणा दिली, अशीही गंभीर टीका त्यांनी केली.
आपण वेष बदलून गृहमंत्री अमित शहा यांना आठ ते दहा वेळा दिल्लीत भेटलो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असताना भाजपाच्या गृहमंत्र्यांना भेटायचे ही राज्याशी बेईमानी आहे. त्यांनी नाव बदलून बुकिंग केले. वेषांतर करून प्रवास केला. विमानतळावर त्यांचे आधारकार्ड, ओळखपत्र तपासले का नाही? सुरक्षेत अशी त्रुटी असेल तर मुंबई, दिल्ली विमानतळ तसेच विमान कंपनीची चौकशी करावी. विमान उड्डाण मंत्र्यांनी चौकशी करून याचा खुलासा करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. विरोधी पक्षनेते असताना गृहमंत्र्यांना भेटायला नाव बदलून का जात होते हे योग्य आहे का, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेषात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री स्वत:ला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवत असले तरी ते दिल्लीला अनेकदा मौलवीच्या वेषात गेलेले आहेत. त्यांना दोन्ही विमानतळावर कुणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड बनवले आहेत. त्यांनी बनावट कागदपत्रे बनवल्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी प्रवासात जी बोर्डिंग कार्ड, ओळखपत्रे वापरली ती जप्त करून गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. या देशात चीन का घुसला, काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसत आहेत, याची तालीम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दाखवून दिली, असे राऊत म्हणाले.