बालासोर – ओडिशाच्या बालासोर जवळील बहानग बजार येथे झालेल्या ट्रेनच्या अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या १०१ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटलेली नाही. तर ५५ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. २ जून रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या महाभीषण अपघातात ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे गाड्यांच्या आघाताची तीव्रता एवढी होती की, कित्येक प्रवासी डब्यांच्या खिडक्या फोडून बाहेर फेकले गेले.
या दुर्घटनेत १,०००हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही आतापर्यंतची सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बालासोर, कटक आणि आसपासच्या शहरांतील रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, अजूनही १०१ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय म्हणाले, ‘या अपघातात सुमारे १,१०० प्रवासी जखमी झाले होते, त्यापैकी सुमारे ९०० जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर सुमारे २०० जणांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७८ जणांपैकी १०१ मृतांची ओळख पटलेली नाही.’