*मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई :कित्येक वर्षे रिलेशनशीप मध्ये राहिल्यानंतर केवळ नातेसंबंध बिघडल्यामुळे जोडीदारावर बलात्काराचा आरोप केला जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या निकालात बलात्काराच्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. एका महिलेकडून तिच्या जोडीदारावर केलेल्या बलात्काराच्या आरोपप्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
जेव्हा दोन व्यक्तींमध्ये नातेसंबंध असतील आणि काही वर्षांनंतर ते बिघडले किंवा लग्नापर्यंत पोहोचले नाही, म्ह्णून ती आपल्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप लावू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये २०१६मध्ये एका महिलेने एका पुरुषावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
२६ वर्षीय महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या व्यक्तीला भेटल्याचे म्हटले होते. त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीने आपण निर्दोष असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीशांनी त्याची याचिका मंजूर करताना नमूद केले की, तो व्यकी आणि ती महिला आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या प्रौढ होते. आपल्या संबंधांची त्यांना जाणीव होती. त्यामुळे महिलेच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या आश्वासनावर हे संबंध ठेवण्यात आले होते, असा निष्कर्ष निघत नाही. न्यायमूर्ती डांगरे यांनी आपल्या निकालात पुढे नमूद केले आहे की, केवळ नातेसंबंधात दुरावा आला म्हणून ते संबंध महिलेच्या इच्छेविरोधात होते, असे म्हणता येणार नाही. तिच्या स्वत:च्या म्हणण्यानुसार, तिने केवळ लग्नाच्या आश्वासनामुळेच नव्हे तर त्या व्यक्तीचे तिच्यावर प्रेम असल्यामुळेही शारीरिक संबंधांना संमती दिली होती, त्यामुळे नातेसंबंध बिघडल्यामुळे जोडीदारावर बलात्काराचा आरोप केला जाऊ शकत नाही,असे न्यायालयाने म्हटले आहे.