ठाणे – राज्यातील कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांची फळी आता पहिल्यांदाच ठाणे शहरात अवतरणार आहे. कॉंग्रेसच्या \’जय भारत सत्याग्रह \” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणीची बैठक उद्या सोमवारी १० एप्रिल रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे.प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेश कार्याध्यक्ष, सहप्रभारी आदींसह इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ही बैठक ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या बैठकीत नवीन कार्यकारणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठरावही केले जाणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. तसेच या निमित्ताने जय भारत यात्रेचा शुभांरभ केला जाणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याचवेळी सत्याग्रह आणि स्वातंत्रविरांची रॅली देखील काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कॉंग्रेसच्या आगामी कार्यक्रमांमधून गटबाजीला तिलांजली दिली जाणार असून मतदारापर्यंत पक्षाचा प्रयत्न असणार आहे.या पत्रकार परिषदेस कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,प्रवक्ते राहुल पिंगळे, रमेश इंदिसे आदी जण उपस्थित होते.
कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची
आज ठाण्यात प्रथमच बैठक
