जालना: राज्यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे फुलांना भाव मिळत नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्तावर फुले फेकून संताप व्यक्त केला आहे. गुलाब,मोगरा,गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला ५ रुपयांचा दर मिळत आहे. फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी फुलांची विक्री न करता 15 ते 20 क्विंटल मोगरा, गुलाब ही फुले नाल्यात फेकून देत व्यापाऱ्यांचा निषेध नोंदवला.
अवकाळी पावसामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे. यात शेतकरी पिकवत असलेल्या उत्पादनाला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकरीला भाववाढीची प्रतिक्षा आहे. तसेच भाजीपाला पिकवित असलेल्या शेतकरी देखील भाव मिळत नसल्याने संकटात आहे. आता फुल उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. फुलांना भाव मिळत नसल्याने फुले रस्त्यावर व नाल्यात फेकून दिली आहेत.