गोंदिया :- जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड जवळ मुंडीपार शिवारातील चंदन आणि इतर फळबागाच्या झाडांना अज्ञात इसमांनी आग लावण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत जवळपास १३० झाडे व सिंचनासाठी लावण्यात आलेले पाईप पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत महिला शेतकरी भावना भाऊराव यावलकर यांचे जवळपास ५ लाखाहून अधिकचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच कृषी व महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. या घटनेची तक्रार डुग्गीपार पोलिसात नोंद करण्यात आली. सौंदड येथे भावना भाऊराव यावलकर यांची शेती होती. मध्यरात्री अचानक शेतातील झाडे आगीच्या स्वाधीन झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच शेतकरी कुटुंब आग विझविण्याच्या कामात लागला. त्याचबरोबर गावातील नागरिकांनी आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच ही झाडे जळाली. जवळपास १३० झाडे जळून खाक झाली.