पुणे : स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एक अचंबित करणारे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार, मतदार हुशार असतात. ते सर्व उमेदवारांकडून पैसे खातात, परंतु ज्यांना मत द्यायचे आहे त्यांनाच ते मत देत असतात. आम्ही एकदा घराघरात एक-एक किलो मटण वाटले होते, तरीही लोकांनी आमचा दारुण पराभव केला होता.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेकांकडून मोठमोठे हार्ंडग लावले जातात. अनेक उमेदवार हे मतदारांना पैसे वाटत असतात. त्यांची हवी ती सोय करतात, परंतु मला वाटते की, निवडणूक जिंकायची असेल तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, तरच निवडणूक जिंकता येते. कारण आम्ही एकदा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी घराघरात एक-एक किलो मटण वाटले होते, तरीही आमचा पराभव झाला.
पक्षातील अनेक जण मला भेटून खासदारकीसाठी तिकीट मागतात. खासदारकीचे तिकीट मिळणार नसेल तर आमदारकीचे तिकीट द्या, असे म्हणतात. हे दोन्ही नसेल तर विधान परिषदेत पाठवा असा आग्रह करतात. अशाने आपला देश बदलणार नाही, असेही गडकरी म्हणाले.