जातवार जनगणना झाली पाहिजे! ओबीसी ज्ञातीची आग्रही मागणी

मुंबई- बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींसह सर्व जातींची जातवार जनगणना झाली झाली पाहिजे अशी आग्रही मागणी ओबीसी ज्ञाती प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आली. मुंबईत आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. भटक्या विमुक्तांचे नेते आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉ. कैलास गौड या बैठकीचे अध्यक्ष होते.

कुणबी, माळी, कोळी, साळी, भंडारी, धनगर, गवळी, गावडा, आगरी, मुस्लिम ओबीसी, भटके विमुक्त समूहातल्या विविध जात समूहांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी जातवार जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. बिहार प्रमाणेच महाराष्ट्रातही जातवार जनगणना झाली पाहिजे असा आग्रह महाराष्ट्र विधान परिषदेत धरणारे आमदार कपिल पाटील यांचेही सर्वांनी अभिनंदन केले. सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करून आरक्षण समाप्त करण्याच्या सरकारच्या षडयंत्राचा निषेध करण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणात ओबीसींच्या शिक्षण हक्कावर टाच येत आहे, त्याविरुद्ध लढण्याचाही निर्धार करण्यात आला.

राजहंस टपके, राजाराम काळे, रवींद्र गावकर, अब्दुल रशीद सोलकर, किशोर वैती, डॉ. विजय पवार, राजन रेडकर, जालिंदर सरोदे, एकनाथ तारमाळे, दत्ताराम राऊत, हृषीकेश सावंत, श्रीधर पेडणेकर यांनी ओबीसी जातीगणना संबधी महत्त्वाचे मुद्दे यावेळी मांडले.

Scroll to Top