नवी दिल्ली- देशात इनफ्लूएंजा व्हायरसने धुमाकूळ घातला असताना आता कोरोनाच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. देशातील ९ जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये नव्याने संसर्ग झालेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील नवीन संसर्ग आकडा ६०० झाला आहे. तब्बल ११७ दिवसानंतर गेल्या २४ तासांतील ही आकडेवारी आहे.
देशातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक,राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मधील तसेच केंद्रशासित प्रदेशातील १५ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट हा ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तसेच ९ जिल्ह्यातील हाच पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांच्या पुढे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे उत्तराखंडमधील पिथोरागडमध्ये सर्वाधिक २५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. काल बुधवारी तर दिल्लीत ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच मिझोराममधील आयजोलमध्ये १६.६७ टक्के आणि त्याखालोखाल हिमाचल प्रदेशातील सिमला -१४.२९ टक्के,मंडी-१३ आणि सोलनमध्ये – १२.५० टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे.