नाशिक- सटाणा तालुक्यातील सुराणे येथील बारावीतील विद्यार्थ्याचा शुक्रवारी सायंकाळी शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.हरिष सुधाकर देवरे (19) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
हरिष काल सायंकाळी 4 च्या सुमारास शेततळ्याजवळ काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा हरिष हा एकुलता एक मुलगा होता. त्याची बारावीची परीक्षा सुरू होती. कुटुंबीय व आजूबाजूंच्या शेतकऱ्यांनी त्याला तत्काळ पाण्यातून बाहेर काढून नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.