पॅरिस – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विदेशातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या युरोप दौऱ्यावर असलेले राहुल गांधी पॅरिसमध्ये बोलताना म्हणाले की, ज्यांना एखाद्या गोष्टीचे नाव बदलायचे ते खरे तर इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आतापर्यंत हिंदूंचे काही धर्मग्रंथ, वेद- उपनिषदे वाचली आहेत. पण त्यात भाजपचे हिंदुत्व कुठेच दिसले नाही.
राहुल गांधी म्हणाले की, आपल्या राज्यघटनेत ‘इंडिया म्हणजेच भारत’ अशी व्याख्या करण्यात आली आहे. अनेक राज्यांना एकत्र संघ करून इंडिया किंवा भारत बनला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्यांमध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. त्यांचा आवाज ऐकला जातो, कुणाचाही आवाज दाबला जात नाही. मी गीता, उपनिषदे आणि इतर अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत, परंतु भाजप जे काही करत आहे, त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. नाव बदलणारे लोक इतिहास नाकारण्याचाच प्रयत्न करत आहे.