मुंबई – राज्यातील सर्व निवडणूका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत युती केली आहे. ही युती ताबडतोब तोडा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेऊ नये. त्यासंदर्भात सर्व जिल्हा व तालुका स्तरावरही सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केलेले खपवून घेतले जाणार नाही, हे लक्षात ठेवा. काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी अबाधित राहिल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे. तसे पत्रकच प्रदेश काँग्रेसने काढले आहे.
त्यात म्हटले आहे की, राज्यात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊनच लढवाव्यात, असे आपणास या पत्राद्वारे सूचित करण्यात येते. यापूर्वीही तशी सूचना केलेली आहे.
पातळीवर अशा प्रकारची युती करण्यात आली असेल तर ती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत तोडण्यात यावी. तसे, न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल तातडीने प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात यावा, अशी सूचनाही प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आली आहे.