मुंबई- संपूर्ण मुंबईवर सध्या पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व सातही धरणांमध्ये सध्या एप्रिल महिन्यात फक्त २५.७० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.जर यंदा जून पाऊस पडला नाही तर मुंबईत हे पाणीटंचाईचे संकट प्रत्यक्षात उतरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी याच काळात हा पाणीसाठा ३० टक्के होता मात्र आता हा पाणीसाठा कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच यावर्षी कमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.याचसाठी मुंबईला भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली आहे. मुंबईच्या आजूबाजूला जरी समुद्र असला तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणारे स्रोत तसे ठरावीकच आहेत. मुंबईला सात धराणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा यांचा समावेश आहे.परंतु या सातही धरणांमध्ये मिळून फक्त २५.७० टक्केच पाणीसाठा मुंबईकरांसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबईला अतिरिक्त पाणी देण्याच्या मागणीचे पत्र आता मंत्रालयात असून राज्य सरकार आता त्यावर योग्य निर्णय लवकरच घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती! २५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक
