मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने चांगलीच तयारी केली आहे.पावसाळ्यात रस्ते अपघात होऊ नये म्हणून पुढील चार महिने मुंबईतील रस्त्यांवर आपत्कालीन परिस्थिती कोणतेही खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.१५ मे पासून तसे आदेशच महापालिका आयुक्त डॉ.इक्बाल चहल आणि पालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीतही एखाद्या रस्त्यावर खोदकाम करावयाचे असेल तर त्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही खोदकाम बंदी येत्या सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रस्त्यावर कोणत्याही खोदकामास परवानगी देऊ नये अशा सूचना आयुक्त चहल यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खोदकाम केले असेल आणि त्यात पाणी साचले असेल तर ते वाहन चालक अथवा पादचाऱ्यांना चटकन लक्षात येत नाही.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. असे अपघात टाळण्यासाठीच पालिका आयुक्तांनी हा रस्ता खोदकाम बंदीचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे सध्या मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून तब्बल ५ हजार पेक्षा जास्त कामे सुरू आहेत.एकंदर साधारण ६ हजार कोटींची ही कामे सुरू आहेत.